आषाढी एकादशी आणि विठ्ठलाच्या भक्तांनी धरलेला उपवास यावरच्या ओव्या फुलाबाई भोंग यांनी इथे गायल्या आहेत. एकादस धरली तर जन्म-मरणाच्या फेऱ्यातून जिवाला मुक्ती मिळते अशी अनेकांची श्रद्धा आहे.
यंदा आषाढी एकादशी २० जुलै रोजी आली. अनेक सश्रद्ध हिंदू संपूर्ण दिवस कडक उपास करतात, फक्त पाणी पितात. पण महाराष्ट्रात अनेक जण दिवसभर उपवास न करता, ज्याला मजेत “मराठी फास्ट फूड” म्हटलं जातं, असा साधा सोपा फराळ करतात. त्यात साबुदाणा खिचडीही आली. टॅपिओका (ज्यापासून साबुदाणा तयार करतात), बटाटा आणि शेंगदाणे अशा “उपासाला चालणाऱ्या” पदार्थांचा यात समावेश असतो.
जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीच्या फुलाबाई भोंग यांनी आषाढी एकादशीच्या उपासाबद्दल पाच ओव्या गायल्या आहेत. हिंदू कालगणनेनुसार आषाढ महिन्याच्या अकराव्या दिवशी पूर्ण दिवस उपवास धरला जातो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती हवी असेल तर हा उपवास करायला पाहिजे अशी भाविकांची धारणा आहे.
फुलाबाई गातात की विठ्ठलसुद्धा या दिवशी उपवास धरतो. आणि गोविंद फळ येणाऱ्या वाघाटीच्या उंच वेलाजवळ रखुमाई शिड्या उभारते. हिरव्या रंगाचं हे फळ औषधी असून एकादशीचा उपवास सोडताना ते शिजवून खाल्लं जातं.


दर वर्षी आषाढी एकादशीसाठी वारकरी पंढरपुराला चालत जातात. पण महामारीमुळे प्रवासावर निर्बंध असल्याने यंदाही वारी झाली नाही
विठ्ठलाचे भक्त असलेले वारकरी ही परंपरा वर्षानुवर्षं पाळत आले आहेत. शेतकरी, शेतमजूर, कारागीर असणारे खेड्यापाड्यातले हे वारकरी दर वर्षी पायी वारी करत महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या पंढरपुरात पोचतात. आषाढी वारी एकादशीला समाप्त होते.
या वारीला तब्बल ८०० वर्षांचा इतिहास आहे. मात्र २०२० साली कोविड-१९ मुळे ही परंपरा पहिल्यांदा खंडित झाली. आणि यावर्षी देखील प्रवासावरच्या निर्बंधांमुळे वारी होऊ शकली नाही.
जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहातल्या वारीवरच्या ओव्या याआधीही पारीवर प्रकाशित झाल्या आहेत. वारकऱ्याची वारी , विठ्ठलावरच्या भक्तीच्या ओव्या – भक्ती आणि रुसवा , संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांवरच्या ओव्या – लोककवींचा विलक्षण ओढा आणि पंढरीच्या वाटेवर जिवलगांची माया या मालिकेत पंढरीला जाताना घरच्या सगळ्यांना न्यावं असं सांगणाऱ्या ओव्या तुम्हाला ऐकायला मिळतील.
या मालिकतेल्या ओव्या आहेत खास आषाढी एकादशीच्या उपवासाबद्दलच्या. फुलाबाई कल्पना करतात की दशमी एकादशीला म्हणतीये की तू किती सरस आहेस – कारण याच दिवशी विठ्ठलाप्रती असलेली भक्ती व्यक्त होते. आषाढीचं महत्त्व आपल्या लेकाला समजावून सांगताना त्या म्हणतात की स्वर्गाच्या दारी तुम्हाला विचारतील, “जिवाची मुक्ती हवीये ना, सांग आजवर किती वेळा एकादशी धरलीयेस?”
आखाडी एकादस माझ्या विठ्ठल लालायला
अगं रुखमिण लावी शिड्या वाघाटीच्या या येलायला
एकादशी पसुयानी दशमी बाई तू सरईस
अगं केळीच्या पानावरी सखा सोडितो बारईस
अगं एकादशेबाई तुझं नाव या कलावती
किती सांगू रे बंधु तुला दर महिन्याला येती
अगं स्वरगाच्या दारी देव करितो पुसापुशी
अगं जिवाला सोडवणं, एकादशी तू केल्या किती
किती सांगू रे बाळा तुला दिल्या जिवाला सोडवणं

कलाकार : फुलाबाई भोंग
गाव : निमगाव केतकी
तालुकाः इंदापूर
जिल्हा : पुणे
जात : फुलमाळी
दिनांक – हे तपशील, ओव्या आणि छायाचित्र ५ ऑक्टोबर १९९९ नोंदवण्यात आले आहेत.
पोस्टरः ऊर्जा
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.