ब्रह्मपुत्रेमध्ये अशी अनेक बेटं आहेत ज्यांची सतत धूप होत असते आणि ती पाण्याखाली जाण्याचा धोका असतो. त्यांना चार असं म्हणतात. रोज सकाळी अशा बेटांवरून मजुरांना घेऊन नावा आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या धुबरी शहरात येऊन पोचतात. शेजारच्या मेघालय राज्यातून बांबूनी बनवलेले तात्पुरते तराफे वाहत वाहत धुबरीमध्ये गदाधर आणि ब्रह्मपुत्रेच्या संगमापर्यंत येऊन पोचतात.
मात्र या संगमावर आता उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दशकात बांबूच्या पट्ट्यांची मागणी कमी झाली आहे. बांबूंपासून कुंपण, चौकटी बनवतात, भिंती आणि लाकडी प्लाय बनवायलादेखील बांबूचा काही भाग वापरतात. पण आता
चार
बेटांवर राहणाऱ्यांनी पूर्वापार चालत आलेली बांबूची गवताने शाकारलेली घरं बांधणं थांबवलं आहे. त्याऐवजी ते आता इकडून तिकडे हलवता येतील अशी घडी घालता येण्यासारखी पत्र्याच्या भिंती आणि छत असणारी घरं उभारत आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमधूनही बांबूच्या पट्ट्यांची मागणी घटली आहे. तिथे स्वस्तात घरं बांधण्यासाठी विटा किंवा पत्र्याचा वापर वाढला आहे.

ब्रह्मपुत्रेच्या विविध बेटांवरून कामगार धुबरीला येतायत
पस्तिशीचा मैनुद्दिन प्रामाणिक रोज कुंतीर चार वरून धुबरीला येतो. त्याला चार लेकरं आहेत आणि कोयत्याने बांबूच्या सुबक पट्ट्या करणे हाच त्याचा पोटापाण्याचा धंदा आहे, ज्याला स्थानिक भाषेत बाशेर काज (बांबूचं काम) असं म्हणतात. तो आठ तासात सरासरी २० बांबूच्या पट्ट्या करतो ज्यासाठी त्याला रु. २५० रोजगार मिळतो. मैनुद्दिनसारख्या इतरही बांबू कारागिरांना स्थानिक मुकादम इथे घेऊन येतात. हल्ली फारसं कामच नाहीये, तो सांगतो, जास्तीत जास्त वर्षाकाठी सहा महिने.


मैनुद्दिन प्रामाणिक (डावीकडे) आठ तासात २० बांबूच्या पट्ट्या करतो ज्यासाठी त्याला २५० रुपये रोजगार मिळतो; धुबरीला नावांच्या घाटावरती गोळा झालेल्या बांबू कारागिरांपैकी एक रजौल करीम (उजवीकडे)

कोयत्याने बांबूच्या पट्ट्या करणेः हे काम आता वर्षाकाठी फक्त सहा महिनेच मिळू लागलंय
प्रत्येक बांबूचे तीन भाग केले जातात – सर्वात वरचा भाग गुळगुळीत असतो तो बांबूच्या भिंती उभारण्यासाठी वापरला जातो; मधला भागही भिंतींसाठी वापरतात, पण तो एवढा गुळगुळीत नसतो; सगळ्यात खालचा भाग लाकडी प्लाय तयार करण्यासाठी माल म्हणून वापरतात.
दर महिन्याला दोन ट्रक माल ते दोन महिन्याला एक ट्रक इतका धंदा उतरला आहे
मजूर बांबूच्या पट्ट्या रस्सीने बांधतात आणि त्याचे गठ्ठे लावून ठेवतात. नंतर हे बाहेर पाठवण्यासाठी ट्रक किंवा इतर मालवाहतुक करणाऱ्या वाहनात लादले जातात. बांबूच्या पट्ट्या ठेवायला भरपूर जागा लागते. त्या लवकर खराब होतात ज्यामुळे बाजारातली त्यांची किंमत कमी होते. मग केवळ स्वस्तात सरपण म्हणून असा बांबू विकायला लागतो.


बांबूची साठवणः धुबरीच्या संगमावर नावांच्या घाटांवर नेहमी आढळणारं दृश्य

घरबांधणीसाठी चार बेटांवर आता पत्र्याला जास्त मागणी आहे
चार बेटांवर राहणाऱ्या लोकांना बांबूची कायम गरज असायची ती आता कमी झाली आहे. सततच्या पुरांमुळे किंवा जमिनीची धूप होत असल्यामुळे त्यांना घरं हलवावी लागतात. मात्र आता बांबूऐवजी घडी घालता येईल अशा आणि जास्त टिकाऊ असणाऱ्या पत्र्याच्या घरांना त्यांची जास्त पसंती आहे.
पूर्वी वनातल्या रोपांना संरक्षण म्हणून बांबूच्या विणलेली तट्टं वनविभागाकडून मोठ्या प्रमाणावर विकत घेतली जात. पण आता वन खातं लोखंडी किंवा प्लास्टिकच्या जाळ्या वापरू लागलं आहे. बांबूची मागणी कमी होण्यामागचं हेही एक कारण.

मुकादम असणारे राधाकृष्ण मोंडल १० रुपये नग या दराने बांबू खरेदी करतात
मुकादम दर मंगळवारी आणि गुरुवारी रोजगार देतात, दोन्ही बाजाराचे दिवस. मैनुद्दिनचे मुकादम राधाकृष्ण मोंडल १० रुपये नग या दराने बांबू खरेदी करतात. त्यांच्याकडे मैनुद्दिन व इतर सात कामगार बांबूच्या पट्ट्या करण्यासाठी कामाला आहेत.
अगदी चार वर्षांमागे मोंडल दोन ट्रकभरून बांबूंच्या पट्ट्या पश्चिम बंगाल आणि बिहारला पाठवायचे. आता, ते सांगतात, दोन महिन्याला एखादा ट्रक जातो.
धुबरी गावातले नावांचे चार घाट एकूण ३५०
चार
बेटांशी जोडलेले आहेत. आणि या चारही घाटांवर बांबूच्या पट्ट्या करणे हेच काम सगळ्यात जास्त चालतं आणि तीच लोकांची उपजीविकाही आहे. प्रत्येक घाटावर किमान सात मुकादम त्यांचा व्यवसाय करतायत.

रोजगाराच्या शोधात आजूबाजूच्या बेटांवरून आलेल्या कामगारांची धुबरीमध्ये कायम वर्दळ असते, मैनुद्दिन आणि इतरांपुढे रोजगाराचे दुसरे काहीही पर्याय उपलब्ध नाहीत.
जरी धंदा बसलेला असला तरी मैन्नुदिनकडे कामाचे इतर फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. ३५० चार बेटांहून बिगारी कामाच्या शोधात – माथाडी, हमाल, रिक्षा ओढणारे, गॅरेजमध्ये काम करणारे, इत्यादी – धुबरीला येणाऱ्यांची संगमावर झुंबड उडालेली असते.